......

नेहमीचीच पायाखालची वाट अनेक दिवस आपण नेमाने चालत राहतो..., आणि अचानक ध्यानी-मनी नसताना एक वेगळे वळण येते.. आणि ती वाटच बदलून जाते. मग नव्या वाटेवर जुन्या पाउलखुणा आपण उगीचच शोधत राहतो. पाऊलांचे ते ठसे... खरतरं तेव्हडीच आपली ओळख, त्या वाटेवर केलेल्या प्रवासाची....

NJ ला आल्यापासून माझेही असेच झाले आहे. नव्या वाटेवर जुन्या पाऊलखुणा मी अजूनही शोधते आहे. अर्थातच त्या सापडल्या नाहित की स्वतःवरच थोडी चरफडते आहे. पण माझ्याही नकळत ह्या शोधाशोधित नवे ठसे उमटवत आहे.... :)

.................................


आज शनिवार असूनही भल्या पहाटे... चक्क ५ ३० वाजता जाग आली. सहज बाल्कनी चे दार उघडले आणि पहाटेच्या शांत, सुखद, निरामय रूपाने भारावून गेले.... नकळत कधीतरी पायात बूट चढवले आणि बाहेर पडले. कित्येक दिवसानी थंड, स्वच्छ, मोकळ्या हवेचा स्पर्श अनुभवला.. वळणाच्या वाटेवरून, धुके पांघरून येणारा सूर्यप्रकाशाचा एक चमचमता सोनेरी किरण, दवामुळे मातीला आलेला ओलसर पावसाळी सुगंध, झाडांना पानांना, खोडांना, आणि मलाही अक्षरश: बीलगलेले ते शांत प्रसन्न क्षण मनाला एक सुंदर अनुभूती देऊन गेले.

सकाळच्या त्या नीरव शांततेत वाटले की ह्या माझ्या रोजच्याच रस्त्यावरची तीच झाडे, पाने, फुले मला नव्याने स्वता:ची ओळख करून देत आहेत. एरवी हीच वाट गाडिखाली तुडवणारी मी, आज त्यांच्या जवळून स्पर्शून जाताना त्यांना जास्त अपलीशी वाटत असेन का? त्याशिवाय एरवी गाड्यांच्या धुरात आणि गोँगाटात मलूल आणि निस्तेज भासणारी ती सगळी आज मात्र नुकत्याच न्हाऊ घातलेल्या सुवासीनिसारखी प्रसन्न का भसतील? त्यांच्या त्या सोनेरी नव्हाळित त्यांनी मनापासून माझेही स्वागत केले आहे... पुन्हा मीच गाडिखाली तुडवून ह्या सौंदर्याचा भंग करणार हे माहीत असूनही... ह्याहून जास्त निरगासपणा इतर कुठे अनुभवता येईल... ?

Mother Nature बोलते, किंबहुना व्यक्त होते, ह्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे... खळखळ वाहणर्‍या झ-यातून उसळणार्‍या लाटेपर्यंत आणि डौलदरपणे डूलणा-या रोपट्यापसुन खुरडल्या गेलेल्या वृक्षापर्यंत... तुमच्या माझ्यासारखीच तिच्याकडेही सांगायला रोजच एक कहाणी असते... गरज असते ती फक्त तिची साद ऐकण्याची...........